मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर पुलाची दुरुस्ती सुरु

author
0 minutes, 7 seconds Read
Spread the love

कोपरगाव,दि.१८-दळणवळणाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील पुलाला मध्यभागी भगदाड पडल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीमुळे ह्या पुलावरून होणारी वाहतूक थांबविण्यात येवून मुंबई-नागपूर महामार्गावरील वाहतूक थांबली होती. त्याबाबत मागील महिन्यात दि.१८ मार्च रोजी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची दिल्ली येथे त्यांच्या शासकीय निवास्थानी भेट घेऊन त्यांच्याकडे या पुलाच्या दुरुस्तीची मागणी केली होती. त्या पाठपुराव्याला यश आले असून संवत्सरच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु झाले असल्याची माहिती आमदार आशुतोष काळे यांनी दिली.

वाहतुकीसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला व राज्यातील प्रमुख शहरांना जोडणाऱ्या जुन्या मुंबई-नागपूर महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर काही ठिकाणी खड्डे पडल्यामुळे मागील काही महिन्यांपासून या महामार्गावरून होणारी वाहतूक बंद करण्यात आली होती. तत्पूर्वी अहिल्यानगर ते सावळीविहीर महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे यासाठी धुळे-मालेगाव-मनमाड-येवला मार्गे कोपरगाव वरून अहिल्यानगरकडे जाणारी वाहतूक पुणतांबा फाट्यावरून याच मुंबई-नागपूर महामार्गावरून वैजापूर मार्गे वळविण्यात आली होती.त्यामुळे या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुक वाढली होती. परंतु या महामार्गावरील संवत्सर येथील गोदावरी नदीवरील पुलावर पडलेल्या खड्यांमुळे अपघात होण्याची शक्यता असल्यामुळे या पुलावरून सर्वच प्रकारची वाहतूक बंद करण्यात आल्यामुळे कोपरगाव वरून वैजापूर, छत्रपती संभाजीनगरला जाणाऱ्या नागरीकांसाठी मोठी अडचण निर्माण झाली होती.

या अडचणीची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेऊन त्यांच्यापुढे वाहतूक बंद असल्यामुळे कोपरगाव-शिर्डी रस्त्यावर होणाऱ्या वाहतूक कोंडीची समस्या मांडून संवत्सर पुलाची तातडीने दुरुस्ती करावी अशी मागणी केली होती. त्या मागणीची दखल घेवून केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री नामदार गडकरी यांनी या पुलाच्या दुरुस्तीचे आदेश दिले होते. त्या आदेशानुसार संवत्सर पुलाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून दुरूस्तीच काम पूर्ण होताच हा पूल पुन्हा वाहतुकीसाठी खुला होवून या पुलावरून पूर्वीप्रमाणे होणारी वाहतूक पुन्हा सुरळीत होणार आहे. त्यामुळे असंख्य वाहनचालकांना व नागरिकांना होणारा मोठा त्रास दूर होणार असल्याचे आमदार आशुतोष काळे यांनी म्हटले आहे.

संवत्सरच्या पुलाचे दुरुस्तीचे काम सुरु झाल्यामुळे या महामार्गाने नियमितपणे ये-जा करणाऱ्या वाहन चालकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तसेच हा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आल्यामुळे या मुंबई-नागपूर महामार्गाच्या लगत कोपरगाव तालुक्यातील अनेक गावातील छोट्या मोठ्या व्यावसायिकांचे व्यवसाय धोक्यात आले होते. परंतु संवत्सर पुलाच्या दुरुस्तीचे काम सुरु झाल्यामुळे पुन्हा एकदा रहदारी सुरळीत होवून व्यवसाय पूर्वपदावर येणार आहेत त्यामुळे कोपरगाव तालुक्याच्या पूर्व भागातील कोकमठाण, संवत्सर, दहेगाव बोलका, लौकी-गोधेगाव, तळेगाव, तसेच वैजापूर तालुक्यातीलही छोट्या मोठ्या व्यावसायिकांनी आमदार आशुतोष काळे यांचे आभार मानले आहे.

चौकट :- संवत्सरच्या पुलाचे दुरुस्तीबाबत आमदार आशुतोष काळे यांनी मागील महिन्यात दि.१८ मार्च रोजी केंद्रीय रस्ते विकास व महामार्ग मंत्री ना.नितीन गडकरी यांची भेट घेतली होती आणि एक महिना पूर्ण होत नाही तोच या पुलाच्या दुरुस्तीच्या कामाला सुरुवात पण झाली आहे. त्यामुळे पाठपुरावा करतांना तो पाठपुरावा किती पोटतिडकीने करायचा आणि जनतेची कामे तातडीने कशी मार्गी लावायची हे आमदार आशुतोष काळे यांच्याकडून शिकण्यासारखे आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *