शेतकऱ्यांच्या खात्यावर १०.६४ कोटी जमा

author
0 minutes, 3 seconds Read
Spread the love

कोपरगाव,दि.३- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना वेळेवर अर्थसहाय्य करण्याची मा.खा.कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांच्यापासून सुरू झालेली  परंपरा आजतागायत कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याने जपली असून ऊस  उत्पादक शेतकऱ्यांच्या विश्वास संपादन केला आहे. हा विश्वास सार्थ ठरवतांना गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्यास ऊस पुरवठा केलेल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांना १५०/- प्र.मे.टन ऊस दराचा दुसरा हप्ता व यापूर्वी जाहीर केलेले ठिबक सिंचनचे अनुदान ठिबक सिंचनने ऊस उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना १००/- प्र.मे.टन  अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेवून सदरची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांनी दिली.

यावर्षी गाळप हंगाम २०२४-२५ मध्ये कारखान्याने प्रतिकूल परिस्थितीत १२१ दिवस चाललेल्या  गळीत हंगामात ६ लाख ५८ हजार ५०० मे.टन ऊसाचे गाळप करून ७ लाख ३४ हजार ४५० क्विंटल साखर पोती उत्पादन घेवून चालू गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. गळीत हंगाम २०२४-२५ मध्ये ज्या शेतकऱ्यांनी ऊस पुरवठा केलेला आहे त्यांना पहिली उचल प्र.मे.टन रुपये २,८००/- याप्रमाणे यापूर्वीच अदा करण्यात  आलेली आहे.

जून महिन्यामध्ये खरीप हंगामाची सुरुवात होत असल्यामुळे शेतकऱ्यांना बी-बियाणे खरेदी करून  पेरणी करता यावी तसेच मुलांच्या शाळा उघडल्याने वह्या पुस्तके खरेदीसाठी आर्थिक हातभार मिळावा याकरिता द्वितीय हप्ता रक्कम रुपये १५०/- प्र.मे. टन देण्याचा व ठिबक सिंचन अनुदान १००/- प्र.मे. टन देण्याचा निर्णय नुकताच संचालक मंडळाने घेतला असून जवळपास १०.६४ कोटी रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले आहेत.

कारखाना कार्यक्षेत्रासह राज्यभर मे महिन्यात अवकाळी पावसाने लावलेली हजेरी त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी आवश्यक असलेली आर्थिक मदत ऊस उत्पादक शेतकऱ्यांना कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याने वेळेत दिल्यामुळे खरीप हंगामाची तयारी करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. जून महिन्यात शाळा महाविद्यालय सुरू होत असतात. त्यामुळे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना शालेय साहित्य खरेदीसाठी देखील मोठी मदत होणार आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासदांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

 

 ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित जोपासण्याची कर्मवीर शंकरावजी काळे साहेबांची शिकवण व आदर्श विचारसरणी डोळ्यासमोर ठेवून माजी आमदार अशोकराव काळे यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ कारखान्याचे कामकाज करीत आहे. आगामी गळीत हंगाम २०२४-२५ करिता शेतकऱ्यांनी आपल्याकडील जास्तीत जास्त ऊस कारखान्यास देऊन सहकार्य करावे.चालू वर्षी चांगले पर्जन्यमान होईल असा हवामान खात्याचा अंदाज आहे. ज्या शेतकऱ्यांकडे पाण्याची उपलब्धता आहे  त्या शेतकऱ्यांनी आडसाली ऊस लागवडी कराव्या. -आ.आशुतोष काळे

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *