कोपरगाव,दि.२-राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या मोठ्या संकटातून जात असून कांद्याच्या दरात झालेली प्रचंड घसरण ही चिंतेची बाब बनली आहे.शेतकरी यामुळे आर्थिक अडचणीत सापडले असून या गंभीर प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी तातडीने बैठक आयोजित करण्यात यावी अशी मागणी आ.आशुतोष काळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे.शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे. याच बरोबर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी तातडीने उपाय योजना करणे आवश्यक आहे.
मिळालेल्या उत्पन्नातून शेतकरी पुढच्या पिकाची लागवड करीत असतो.मात्र गेल्या काही दिवसांपासून बाजारपेठेत कांद्याचे भाव कोसळले आहेत. कांदा उत्पादनासाठी लागणारा खर्च आणि प्रत्यक्ष मिळणारा बाजारभाव यामध्ये मोठी तफावत असल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही वसूल होत नाहीये. कोपरगाव परिसरात मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड केली जाते मात्र कवडीमोल भावामुळे येथील शेतकरी हवालदिल झाला आहे.
आपल्या रक्ताचे पाणी करून पिकवलेला कांदा मातीमोल भावाने विकण्याची वेळ आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजीची लाट निर्माण झाली आहे.कांदा उत्पादक शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे परंतु सध्याच्या बाजार स्थितीमुळे तो पूर्णपणे कोलमडून गेला आहे. ही परिस्थिती लक्षात घेता आमदार आशुतोष काळे यांनी पुढाकार घेवून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने बैठक घेण्याची मागणी केली आहे.