जगदीशचंद्र जोशी,प्रतिनिधी
धाराशिव,दि.१७-बीड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या मांजरा धरणातील पाणलोट क्षेत्रात सातत्याने पाऊस होत असल्याने पाण्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढत आहे.त्यामुळे धरण पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने (शनिवारी ता.१६) दुपारी सव्वा दोन वाजता मांजरा प्रकल्पाचे चार वक्रद्वारे ०.२५ मीटर उंचीने उघडून मांजरा नदीपात्रात ३४९४.२८ क्यूसेक्स (९८.९६क्यूमेक्स ) इतका पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.

मांजरा धरण पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे कळंब तालुक्यातील खडकी,लोहटा (पूर्व-पश्चिम), करंजकल्ला, कोथळा,हिंगणगाव, दाभा,आवाड शिरपूरा,सौंदणा आंबा,वाकडी यांसह परिसरातील अनेक गावांतील एकूण १८,२२३ हेक्टर शेती क्षेत्राला पाणीपुरवठा होणार आहे.यामुळे ऊस व बागायती शेतीच्या उत्पादनात वाढ होऊन परिसरात संपन्नता निर्माण होणार आहे.
तसेच धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल.तरी, मांजरा नदी काठावरील पुरामुळे बाधित होणाऱ्या गावातील नागरीकांनी सतर्क रहावे. कोणीही नदीपात्रात प्रवेश करू नये व कुठलीही जिवीत अथवा वित्त हानी होणार नाही याची खबरदारी घ्यावी,असे आवाहन पाटबंधारे विभागाचे वतीने करण्यात आले आहे.