साडे तीन वर्षात उर्वरित विकास कामे पूर्ण होवून कोळपेवाडीसह संपूर्ण मतदार संघाचा पूर्ण कायापालट होईल-आ.आशुतोष काळे

author
0 minutes, 6 seconds Read
Spread the love

कोपरगाव,दि.५- विकासाचा अनुशेष भरून काढतांना मागील सहा वर्षात मतदार संघाच्या विकासासाठी हजारो कोटींचा निधी आणल्यामुळे वर्षानुवर्षे ज्या रस्त्यांनी कधी खडी आणि डांबर बघितले नव्हते त्या रस्त्यांना मंजुरी मिळवून ते रस्ते डांबरी केले आहे.कोळपेवाडी आणि सुरेगाव परिसरातील अनेक रस्ते आणि विकासकामे मंजूर असून निधी उपलब्ध होताच या विकास कामांना प्रारंभ  होईल. जनतेला अपेक्षित असलेली बहुतांश विकास कामे सहा वर्षात पूर्ण झाली असून उर्वरित विकास कामे मंजुरीच्या अंतिम टप्यात आहे. त्यामुळे अजून साडे तीन वर्षात उर्वरित सर्व विकासकामे पूर्ण होवून विकासाच्या बाबतीत कोळपेवाडी परिसरासह संपूर्ण मतदार संघाचा कायापालट होईल असा विश्वास आ.आशुतोष काळे यांनी व्यक्त केला.

कोपरगाव मतदार संघातील कोळपेवाडी येथे १.०६ कोटीच्या विविध विकासकामांचे लोकार्पण आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते संपन्न झाले याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ.प्रकाश कोळपे होते. यामध्ये श्री महेश्वर मंदिर परिसर सुशोभीकरण करणे (५० लाख ), श्री महेश्वर मंदिर परिसरात रस्ता काँक्रिटीकरण करणे(१० लाख), जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत ०२ खोल्या बांधणे (२४ लाख), उर्दू प्राथमिक शाळा खोली बांधणे (१२ लाख) व सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती सोय करणे (१०लाख) आदी कामांचे लोकार्पण करण्यात आले.

 कोळपेवाडी परिसरात व्यापारी संकुलाची उभारणी करून व्यापाऱ्यांसाठी मोठी बाजारपेठ तयार करायची आहे. कोळपेवाडी, सुरेगाव, शहजापूर आणि कोळगावथडी या परिसरात भुयारी गटारी करून सांडपाणी एका ठिकाणी जमा करून एसटीपी प्लांटच्या माध्यमातून प्रक्रिया केलेले पाणी वापरता येईल अशी सुविधा निर्माण करायची आहे.कोळपेवाडी जिल्हा परिषद शाळेसाठी सांस्कृतिक भवनाची केलेली मागणी पूर्ण करू. 

विकासकामांसाठी लागणारा निधी राज्य शासनाच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना.अजित पवार यांच्या सहकार्यातून निधी आणण्याची जबाबदारी माझी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून विकासकामांबरोबरच नागरिकांना लाभाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सार्वजनिक विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची सत्ता आवश्यक आहे. २०२४ च्या विधानसभा निवडणूकीत ऐतिहासिक विजय मिळवला असला तरी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत २०१६ ची पुनरावृत्ती करायची आहे त्यासाठी सगळ्यांनी कामाला लागावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी मोठ्या संख्येने उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांना केले.

या वेळी माजी सरपंच तथा कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे यांनी सांगितले कि, २०१९ नंतर आ. आशुतोष काळे यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मार्गी लागली असून कोळपेवाडी परिसराचा विकास झाला आहे. उर्दू आणि मराठी जिल्हा परिषद शाळांच्या खोल्यांसाठी, श्री.महेश्वर मंदिर परिसर सुशोभिकरण,श्री.महेश्वर मंदिर परिसरात रस्ता काँक्रीटीकरण आणि सार्वजनिक ठिकाणी दिवाबत्ती करण्यासाठी आ.आशुतोष काळे यांनी ०१ कोटीहून अधिकचा निधी उपलब्ध करून दिला आहे.त्यामुळे येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारांना भरभरून मतदान करणार असल्याचे सांगितले.

यावेळी ह.भ.प.सचिन महाराज पवार, कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे संचालक सूर्यभान कोळपे, कचरु कोळपे, सुकदेव कोळपे,गंगाधर कोळपे,अर्जुनराव कोळपे,सरपंच सौ.चंद्रकला कोळपे,उपसरपंच सौ.सुनिता कोळपे, सर्व सदस्य, ग्रामविकास अधिकारी आर.पी.सय्यद, मुख्याध्यापक पुंडलिक सोनवणे, पंचायत समिती शाखा अभियंता राजेंद्र दिघे, सार्वजनिक बांधकाम विभाग कनिष्ठ अभियंता जयंत गडदे, पशु सहाय्यक आयुक्त डॉ.दिलीप जामदार, विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *