मुंबई,दि.२६-लहरी हवामान आणि शेतमालाच्या अनिश्चित दरामुळे शेतकरी नेहमीच अडचणीत असतो. शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी ओळखून शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीतून बाहेर काढण्यासाठी महायुती शासनाने शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचा घेतलेला निर्णय अतिशय योग्य आहे. परंतु हा निर्णय घेतांना आजवरचा अनुभव पाहता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांवर कर्जमाफी होणाऱ्या शेतकऱ्यांच्या तुलनेत काहीसा अन्याय झाला आहे. त्यामुळे ही कर्जमाफी करताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांनाही तेवढाच मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी आमदार आशुतोष काळे यांनी शेतकरी कर्जमाफी समितीचे अध्यक्ष व राज्याचे मुख्यमंत्री नामदार देवेंद्र फडवणीस यांचे आर्थिक सल्लागार प्रवीण परदेशी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
राज्यभरातील शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणीची दखल घेऊन महायुती शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महायुती शासनाच्या वतीने अभ्यास समिती नियुक्त केली आहे.या समितीच्या अहवालानुसार कर्जमाफी बाबत निर्णय घेण्यात येणार आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळालाच पाहिजे. परंतु अत्यंत कठीण परिस्थितीतही घेतलेल्या कर्जाची वेळेत कर्जफेड करण्यासाठीं बहुतांश शेतकरी आपल्या आवश्यक गरजा बाजूला ठेवून वेळप्रसंगी पोटाला चिमटा देवून आपले कर्ज थकणार नाही याची काळजी घेत असतात. आजवर झालेल्या कर्ज माफीचा अनुभव पाहता नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना त्या तुलनेत लाभ मिळालेला नाही. त्यामुळे शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेताना नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांच्या मनात काहीशी अन्यायाची भावना निर्माण होणार नाही याचीही काळजी घेणे तितकेच गरजेचे आणि महत्वाचे आहे.