एनसीएमसी कार्ड काढण्यास मुदत वाढ द्या

author
0 minutes, 5 seconds Read
Spread the love

      राज्य शासनाच्या निर्णयानुसार अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला तसेच विद्यार्थी आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी एनसीएमसी कार्डची नोंदणी केली आहे. मात्र ग्रामीण भागातील व कोपरगाव मतदार संघातील जवळपास ५० टक्के लाभार्थ्यांचे एनसीएमसी कार्डची नोंदणी होणे बाकी आहे. राज्य शासनाने १ सप्टेंबर पासून एनसीएमसी कार्ड अनिवार्य केले असून तांत्रिक व वैयक्तिक अडचणींमुळे कार्ड न काढलेल्या हजारो पात्र ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाश्यांना पूर्ण रक्कम भरून तिकीट काढावे लागत आहे.      

     अचानक सवलतीचे अर्धे तिकीट बंद झाल्यामुळे आधीच ग्रामीण भागातील महिलांवर मोठा आर्थिक भार पडत आहे. अनेक महिला व ज्येष्ठ नागरिक प्रवासासाठी लागणारे अर्ध्या तिकिटाचे पैसे सोबत घेऊन प्रवास करीत असतांना एनसीएमसी कार्ड नसल्यामुळे सबंधित महिला व ज्येष्ठ नागरीकांकडून पूर्ण तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे अनेक महिलांना प्रवासादरम्यान आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.

      ग्रामीण भागातून नोकरी किंवा शिक्षणानिमित्त तसेच मोठ्या हॉस्पिटल व शासकीय कामासाठी शहरात ये-जा करणाऱ्या महिलांचा दिवसभराचा दिनक्रम अतिशय गडबडीचा असल्याने कार्ड नोंदणीसाठी अनेक महिलांना वेळेत एनसीएमसी कार्ड काढणे  शक्य झालेले नाही. सध्या एनसीएमसी कार्डची नोंदणी व वाटप करण्याचे काम सुरू आहे. परंतु अनेक लाभधारकांच्या अंगठ्याचे ठसे जुळत नाही तसेच कार्ड नोंदणीसाठी आवश्यक असणारी यंत्रणा अपुरी पडत आहे.

      नेटवर्क व तांत्रिक अडचणींमुळे जवळपास ५० टक्के लाभधारकांचे एनसीएमसी कार्ड काढायचे बाकी असून सर्व पात्र लाभार्थ्यांना एनसीएमसी कार्ड काढण्यासाठी मुदत वाढ देऊन कार्ड मिळेपर्यंत पूर्वीप्रमाणेच ज्येष्ठ नागरिक व महिलांना सवलत लागू ठेवण्यासंदर्भात एसटी महामंडळाला तातडीने निर्देश द्यावेत अशी मागणी दिलेल्या निवेदनात आ.आशुतोष काळे यांनी राज्याचे परिवहन मंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्याकडे केली आहे.

Similar Posts

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *